विचार शलाका


श्रीअरविंद व श्रीमाताजी

 

संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम पाँडिचेरी-२

पान क्र. ०१


 

प्रकाशक :

संजीवन कार्यालय
श्रीअरविंद आश्रम

पाँडिचेरी-२

१९७९

© श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट

या ग्रंथासाठी वापरलेला कागद सरकारच्या
विशेष सवलतीनुसार मिळालेला आहे.

मुद्रक :

ज्योतीशिखा प्रेस, सरदार पटेल स्ट्रीट, पाँडिचेरी-१

पान क्र. ०२


 

श्रीअरविंद - वचनामृत

“हे आत्म्या, माझ्या आत्म्या, आम्हीं स्वर्ग निर्माण केला आहे.

आमच्या अंतरंगांत देवाचें राज्य येथें आम्हीं शोधून काढलें आहे;

वाचाळ अज्ञानपूर्ण जगामध्यें त्याचा दुर्ग आम्हीं बांधला आहे.

आमचें जीवन दोन सरित्-प्रवाहांच्या वेढ्यामध्यें रक्षिलें गेलें आहे.

अवकाशास आम्हीं शांतीच्या उपसागरामध्यें परिणत केलें आहे,

देहाला परमानंदाचें देव-मंदिर बनविलें आहे.

अजूनहि अधिक, कांहीं करावयाचें राहिलें आहे? काय राहिलें आहे?''
विकसनशील चैतन्याच्या मंद गतीमध्यें,

जन्म आणि मृत्यु यांच्या मध्यंतरींच्या अल्पकालिक क्रीडाभवनामध्यें

पूर्णत्वाची पहिली पायरी शेवटीं एकदां आम्हीं गांठली आहे.

आमच्या प्रकृतिरूपीं काष्ठ-पाषाण-सामुग्रींतून,

स्वर्गीय देव-वृंद निवास करूं शकतील असें एक देवालय साकारलें आहे.
संघर्षपूर्ण जग जरी दूर बाजूला राहिलें असलें तरी

एकाहि मानवाच्या पूर्णत्वानें जगाचा उद्धार होऊं शकेल.

नभोमंडळाशीं एक नूतन सामीप्य साध्य झालें आहे.

वसुंधरा व स्वर्ग यांचा हा प्रथमच वाङ्निश्चय झाला आहे,

सत्य आणि जीवन यांचें एक आंतरिक स्वरैक्य साधलें आहे.

मानवी कालावधींत परमेश्वराच्या शिबिराचा पाया घातला आहे.

सावित्री ७।५

*

      केवळ जडभौतिक जीवनचक्रांत अंधपणें फिरत रहावयाचें किंवा या जगांतील जीवनामधील संकटांपासून माघार घेऊन अनिर्वचनीय ब्रह्माच्या निश्चल-नीरवतेमध्यें जावयाचें यासाठीं नव्हे, तर संपूर्ण जीवनच रूपांतरित करण्यासाठीं एका महत्तर दिव्य सत्याची व चेतनेची शांति, प्रकाश

पान क्र. ०३


 

व शक्ति खालीं आणण्याचा प्रयास आज भारतांतील महान् आध्यात्मिक साधक करीत आहेत. एकच एक उद्देश समोर ठेवून, त्या सर्वाधार शांतीमध्यें निरंतर राहून, तसेंच त्या प्रकाशाच्या आणि शक्तीच्या वाढत्या आणि समीप आलेल्या अवतरणाची अनुभूति घेत चालविलेल्या या अनेक वर्षाच्या प्रयत्नामुळेंच पुढचा मार्गहि अधिकाधिक स्पष्ट होत आहे. आपल्या पारंपरिक आध्यात्मिक समृद्धीमध्यें प्रविष्ट होण्यास भारताच्या आत्म्याची तयारी झालेली दिसत आहे; आणि जेव्हां याच भरतभूमींतून मानवजातीच्या उच्चतम भविष्याप्रत जाणारा मार्ग दाखविला जाईल व त्यासाठीं आवाहन केलें जाईल असा अभूतपूर्व महानतेचा काळ समीप येत असलेला दिसत आहे.

*

      आमचें उद्दिष्ट आहे अतिमानस-सिद्धि. म्हणून त्यासाठीं वा त्याच्या दिशेनें जाण्यासाठीं जें जें कांहीं आवश्यक असेल, तें तें प्रत्येक अवस्थेच्या परिस्थितीनुसार आम्हीं केलें पाहिजे. सध्यां, भौतिक चेतनेची तयारी करण्याची आवश्यकता आहे; त्यासाठीं स्थूल शरीर व निम्नतर प्राण या भागांत, पूर्ण समता व शांति आणि वैयक्तिक कामना-वासनांपासून मुक्त असें पूर्ण आत्मार्पण प्रस्थापित केलें पाहिजे. अन्य गोष्टी त्यांच्या योग्य वेळीं येतील. शारीरिक सान्निध्यावर भर देण्याची आज गरज नाहीं -- अन्य गोष्टीपैकीं ती एक आहे -- परंतु भौतिक चेतनेची आंतरात्म्याप्रत उन्मुखता आणि त्याची तेथें सतत उपस्थिति व मार्गदर्शन यांची आज आवश्यकता आहे.

*

      आपल्या भावनिक व शारीरिक कामनावासनांची अधिकांत अधिक

पान क्र. ०४


 

तृप्ति अतिमानसिक जीवन करील अशी कल्पना असेल तर ती दूर टाकून द्या. मानवांतील पाशवी अंश वाढविण्याविषयींची, त्याच्या प्रकृतींत दृढमूल होऊन राहिलेली ही आशा, दिव्य-सत्याच्या अवतरणाच्या मार्गांतील सर्वांत मोठी अडचण आहे. अतिमानसिक अवस्थेंत आपल्या भावभावना व पूर्वरचित मनोरचना यांचें समर्थन व्हावें अशी मनाची इच्छा असते; अतिमानसिक अवस्था म्हणजे आपली सुवर्धित व परिपुष्ट अशी प्रतिमा असावी असें प्राणास वाटतें; शरीराला पाहिजे असतो अतिमानसिक अवस्थेंत स्वतःचा आराम, सुखसोयी आणि प्रिय संवयी यांची अतीव वाढ. हें असेच जर अतिमानसिक अवस्थेंत होणार असेल, तर ती अवस्था म्हणजे पाशवी आणि मानवी प्रकृतीचीच अतिवर्धित व अतिविस्तारित तशी परिणत अवस्था होईल; तें मानवतेचें दिव्य भगवत-स्वरूपांतील रूपांतर कांहीं होणार नाहीं.

*

      “हदयांतील मातेचे अस्तित्व तुम्हांपैकीं ज्यांना थरारून सोडीत आहे त्या सर्वांनीं 'अहं' चा काळा पडदा दूर झुगारून, भिरकावून द्यावा; आलस्याच्या बंधनकारी भिंती जमीनदोस्त कराव्या; तुमच्या शरीरानें, तुमच्या बुद्धीनें, तुमच्या वाणीनें, किंवा तुमच्या संपत्तीनें अथवा तुमच्या प्रार्थनेनें व पूजनानें, प्रत्येकानें आपापल्या कुवतीप्रमाणें, योग्य वाटेल त्या मार्गानें भारतमातेला साह्य करावें.”

*

      भौतिक जगाचा आधार व उगम असलेल्या, मानवास अंतर्बाह्य व्यापून असलेल्या आत्मिक जगावर भारताचा विश्वास आहे व त्याला त्याची किल्ली सांपडलेली आहे. ह्याचाच शोध करण्याचा प्रयत्न युरोपने हळुंहळुं सुरू केलेला आहे; भौतिक जगताच्या द्वारांतून त्यापलीकडील जगताचें दर्शन ओझरतें त्याला झालेलें आहे, त्याची किल्ली, शोधण्यासाठीं

पान क्र. ०५


 

तो चांचपडत आहे, पण अजून त्याला ती सांपडलेली मात्र नाहीं. 

      ..... स्वतःचा वैयक्तिक संकुचित 'स्व' सोडून देऊन त्याहून व्यापक असा 'स्व' दुसऱ्यांमध्ये, राष्ट्रामध्यें, मानवतेमध्यें आणि परमेश्वरामध्यें पहा, असा भारताचा संदेश आहे. पण जगाला हा संदेश देण्यांतच नुसतें त्यानें समाधान मानतां कामां नये, तर त्यानें जागृत होऊन, अखिल जगताला त्यानुरूप स्वतः वर्तन करून दाखविलें पाहिजे. म्हणजे व्यक्ति आणि राष्ट्र या दोघांच्याहि जीवनाची घडण याप्रमाणें होणें शक्य आहे ही गोष्ट प्रत्यक्ष सिद्ध होईल.

*

      स्वातंत्र्याचें आणि समतेचे एकीकरण बंधुभावाच्या जोरावरच साध्य होणें शक्य आहे; अन्य कशा वरहि तें आधारतां येणें शक्य नाहीं. परंतु बंधुता ही आत्म्यामुळें व आत्म्यामध्येंच असते; दुसऱ्या कशांतच नसते. कारण बंधुता ही शारीरिक साधर्म्यांतून, प्राणिक हितसंबंधांतून अथवा वैचारिक मतैक्यांतून उद्भवत नाहीं. जेव्हां जीवात्मा स्वातंत्र्याची मागणी करतो, तेव्हां तें स्वतःच्या विकासाचें, मानवाच्या संपूर्ण स्वरूपामधील दिव्यत्वाच्या प्रकर्षाचें स्वातंत्र्य असतें. जेव्हां तो समतेची मागणी करतो, तेव्हां तसें तें स्वातंत्र्य सर्वांना समसमान मिळून सर्व मनुष्यप्राण्यांत त्या एकाच देवतेला, आत्मदेवाला मानलें जावें, अशी त्याची मागणी असते. जेव्हा तो बंधुतेसाठीं खटपट करतो तेव्हां स्वप्रकर्षाचें तें समसमान स्वातंत्र्य तो एका ध्येयकल्पनेच्या, एका जीवनाच्या, एका आंतरिक आध्यात्मिक एकतेस मानणाऱ्या मनोमनी ऐक्याच्या पायावर आधारित असतो. खरोखरी या तीन गोष्टी म्हणजे जीवात्म्याची स्वाभाविक प्रकृतीच आहे. कारण मुक्ति, समता व एकता हेच परमात्मस्वरूपाचें देखील शाश्वत गुण आहेत.

*

पान क्र. ०६


 

      श्रद्धा असेल तर सर्व कांहीं योग्य असेंच घडून येतें. या अत्यावश्यक श्रद्धायुक्त धैर्यावांचून कोणतेंच महान् कार्य आजपर्यंत घडून आलेलें नाहीं. आपल्या अहंकारामुळें आपली दिशाभूल होऊन आपण समजतो कीं आपणच सर्व कार्य करीत आहोत व याचकारणामुळें, एकादें काम हातीं घ्यावयाचें झालें म्हणजे त्यास लागणारें सामर्थ्य, साधनें व आवश्यक गुण आपल्याजवळ आहेत कीं नाहींत असा विचार आपण करूं लागतो. परंतु वास्तविक पहातां ईश्वराच्या संकल्पामुळेंच प्रत्येक कार्य घडत असतें.

      कांहींवेळां एकाद्या गोष्टीची आपण तीव्रतेनें इच्छा करतो व ती गोष्ट साध्य होते. कारण ती इच्छा म्हणजे खरोखरी प्रार्थनाच असते आणि कोणत्याहि मनःपूर्वक, आर्त प्रार्थनेला फळ आल्याशिवाय रहात नाहीं. अशी प्रार्थना जाणीवपूर्वक देवालाच उद्देशून म्हटलेली असली पाहिजे असें नाहीं; कारण विशिष्ट शब्दरचना म्हणजे प्रार्थना नसून त्या पाठीमागची अभीप्सा म्हणजे प्रार्थना असते. मात्र त्यांत यशस्वी व्हावयाचें असेल तर ही अभिप्सा संपूर्णतः निःस्वार्थी असली पाहिजे; क्षुल्लक लाभाचा आणि निकृष्ट ध्येयाचा विचार त्यांत मिसळता कामां नये. आपल्या अभीप्सेमध्यें जेव्हां आपण स्वार्थाचें मिश्रण करतो तेव्हां तेवढ्या प्रमाणांत आपल्या प्रार्थनेचें सामर्थ्य आपण कमी करतो. अर्थांतच त्या मानानें यशांतहि अपूर्णता येते.

*

      कोणतीहि क्रांति कोणत्या वळणानें जाईल, काय स्वरूप धारण करील हें जाणणें अशक्य असून तिला कोणी आळाहि घालू शकत नाहीं. प्रक्षुब्ध महासागरावर प्रचंड लाटा उसळत असात, पण त्या कशा उसळाव्या हें त्याला कोण सांगूं शकेल? सोसाट्याच्या वादळाची गति कोणती मानवी बुद्धि रोधूं शकेल? कोणत्याहि क्रांतीचीं सूत्रें परमेश्वराच्या सर्वज्ञ संकल्पामध्यें असतात. त्या सर्वज्ञानें निवडलेलें केवळ एक साधन, हस्तक आपण.

पान क्र. ०७


 

कांहीं अधिक समजण्याचा आपणांस अधिकार नाहीं. आपलें कार्य संपल्याचें आपण ओळखलें पाहिजे; व निदान एवढें तरी कार्य करावयास आपणांस मिळालें म्हणून आनंद वाटला पाहिजे.

*

      भारताला महान् आणि स्वतंत्र करण्यासाठीं ज्यांनीं आपल्या कृतींनीं, शब्दांनीं किंवा त्यापेक्षांहि अधिक महत्त्वाच्या अज्ञात दुःखभोगांनीं राष्ट्रसेवेत साह्य केलें, अशा थोर ऐतिहासिक व्यक्तींच्या मालिकेत आपलें नांव गणले, तर तें आपल्या मोठ्यांत मोठ्या सेवेसहि पुरेसें पारितोषिक नाहीं काय? एवढेंच काय पण दुसरे कुठेंहि आपलें नांव किंवा नोंद न राहतां परमेश्वराच्या अदृश्य ग्रंथांतच केवळ नोंद झाली व राष्ट्राचा रथ पुढें ढकलण्यासाठीं अल्पसा कां होईना पण निदान आपला हातभार तरी लागला एवढें समाधान मिळून जरी मरण पत्करावें लागलें तरी तेंहि आपणांस पुरेसें पारितोषिक नाहीं काय? वास्तविक सेवेची ही भाषाहि शेवटीं क्षुल्लकच आहे. मोबदल्यासाठीं कां आपण मातृभूमीची सेवा करतो? मोलाची मजुरी म्हणून कां कधीं देवकार्य करावयाचें असतें? देशभक्त आपल्या मातृभूमीसाठींच प्राणार्पण करतो कारण तिचाच तो आदेश असतो.

*

पान क्र. ०८


 

      प्रगति करून घेण्यासाठीं तुम्हांला सर्व जुन्या समजुती, धारणा फेंकून दिल्या पाहिजेत, सर्व पूर्वकल्पित विचारांचा विध्वंस केला पाहिजे. संवयींच्या स्वरूपांतील अगणित मानसिक रचनांमध्यें तुम्ही रहात असता, त्या सर्व ठरीव सांच्याच्या असतात; त्यामुळें त्यांत लवचिकपणा नसतो, त्या प्रगत होऊं शकत नाहींत. तुम्हीं या सर्व गोष्टी ढासळून पाडल्या पाहिजेत. असें केलें तरच, त्यानंतरच फक्त, नूतन कल्पना जन्मतील. सर्जनशील, क्रियाशील अशी विचारसरणी अद्भूत होईल.

*

      टीका करण्याची, विशेषतः कांहीं माहीत नसतांना दुसऱ्यांच्यावर टीका करण्याची प्रवृत्ति म्हणजे सबंध जगालाच जडलेल्या रोगांपैकीं एक रोग आहे. सर्व प्रकारच्या कल्पना, तर्कवितर्क, अतिशयोक्ति, विपरीत ग्रह आणि नसत्याच गोष्टी शोधून काढण्याची अजब खोड या सर्व गोष्टी या टीकेंत असतात. आपल्यांतील प्राणतत्त्वाचा, वासनात्मक पुरुषाचा हा एक रोग आहे. बाह्य जीवन बदलण्याच्या दृष्टीनें आंतरिक अनुभवांचा जर कांहीं चिर परिणाम व्हावयाचा असेल, तर वाक्-संयम, ह्या वर सांगितलेल्या रोगाचा त्याग आणि वासनांचा समूळ नायनाट ह्या गोष्टी अत्यंत
आवश्यक आहेत.

*

      दुसऱ्यासंबंधीं न बोलण्याचा किंवी साभार बुद्धीनें टीका न करण्याचा कटाक्ष असणें फार चांगलें. त्यासाठीं या गोष्टी हव्यात : वस्तू आणि घटना यांजकडे पाहणारी सूक्ष्म आणि खोल दृष्टि व सारग्राही जाणीव वाढविली पाहिजे. त्यामुळें आपणांमधील व दुसऱ्यांमधील प्रकृतीच्या हालचाली, क्रिया आंतरिक शांततेमध्यें जाणून घेतां येतात आणि आपली

पान क्र. ०९


 

जाणीव विचलित होत नाहीं. वरवरच्या गोष्टींमध्यें तिला गोडी वाटत नाहीं आणि बाह्य हालचालींमध्यें ती गुरफटून जात नाहीं.

*

      भगवंताचे मार्ग हे आपल्या मानवी मनाच्या मार्गाप्रमाणें किंवा आपल्या मानसिक कल्पना या रचना याप्रमाणेंहि नसतात. भगवंताच्या कार्यपद्धतीविषयीं मनानें निर्णय देणें किंवा त्यानें काय करावें अथवा काय करूं नये हें आपण ठरवून देणें हें अशक्य आहे. कारण, आपल्यापेक्षां भगवंताला अधिक कळतें. आपण जर खरोखरीच भगवंताला मानीत असूं, तर मला असें वाटतें कीं, आपली खरी बुद्धि व भक्ति या दोन्हीहि एकच अपेक्षा करतात; आणि ती म्हणजे खरी संपूर्ण श्रद्धा आणि आत्म-समर्पण.

*

      आपल्या मनाची किंवा प्राणाची इच्छा भगवंतावर न लादतां भगवंताच्या इच्छेचा स्वीकार करून त्याचें अनुसरण करणें ही साधनेमधील खरी भूमिका आहे. “हा माझा हक्क आहे, हें मला पाहिजे आहे, हें मला मिळालेंच पाहिजे, याची मला गरज आहे, हीं मला आवश्यक गोष्ट आहे; मग हें सर्व मला कां मिळूं नये?” असें साधकानें म्हणूं नये. उलट स्वतःस भगवंताला समर्पण करावें, त्यास शरण जावें व तो जें देईल त्याचा आनंदानें स्वीकार करावा, कुरकुर किंवा बंड करूं नये; हा अधिक चांगला मार्ग आहे. या भूमिकेनें तूं जें स्वीकारशील तें तुझ्यासाठीं उचितच ठरेल.

*

      आपण जागरूक असूं, तर आपल्या भोंवतालच्या व्यक्तींपैकीं प्रत्येकजण

पान क्र. १०


 

हा आपल्या अस्तित्वाचें एक किंवा अनेक अंगें प्रतिबिंबित करणाऱ्या आरशाप्रमाणें असतो. त्यापासून फायदा कसा करून घ्यावयाचा हें जर आपणांस माहीत असेल, तर आपल्या प्रगतीच्या दृष्टीनें ती एक फारच मोठी मदत असते; आणखी त्यांतच जर ती आरसारूपी व्यक्ति कळकळीची व आपणांविषयीं सदिच्छा बाळगणारी असेल, तर त्यापासून मिळणाऱ्या मदतीचें मोल विशेषच असतें.

*

      मन जेव्हां शंकित आणि हताश होतें, तेव्हां म्हणावें, “मी भगवंताचा आहे, मी अपयशी ठरूं शकणार नाहीं.'' अशुद्धि आणि अपात्रता यांच्या सूचक प्रेरणांना म्हणावें, “मी अमरत्वाचें बालक म्हणून भगवंतानें मला पसंत केलें आहे. मी मला स्वतःस आणि भगवंतास प्रामाणिक, सत्यनिष्ठ राहिलों म्हणजे विजय निश्चित आहेच; आणि यदाकदाचित माझें अधःपतन झालें, तरी देखील मी पुनः उठेन.” मार्ग सोडून, एकादें सामान्य ध्येय स्वीकारून त्याच्या सेवेस उद्युक्त करणाऱ्या प्रेरणांस म्हणावें : “माझ्या आत्म्यास समाधान प्राप्त करून देणारें हेंच एकमेव सत्य आहे; दिव्य-जीवन-पथ अगदीं अखेरपर्यन्त मी आक्रमीत राहीन, मग माझ्या या यात्रेंत वाटेल त्या कसोट्या आणि भयंकर दुःखभोग कां असेनात, मी ते सारे सोसून अखेरपर्यन्त टिकाव धरीन.''

*

      सर्वकांहीं परमेश्वरासाठींच केलें पाहिजे. सर्वकांहीं परमेश्वराकडे वळविलें पाहिजे. आपलें स्वतःचें अस्तित्व वेगळें समजून कांहींहि करतां कामा नये. आपले शेजारी, मित्र, नातेवाईक असोत, किंवा देश वा मानवता असो, किंवा अन्य प्राणिमात्र असोत, केवळ ते आपल्या वैयक्तिक

पान क्र. ११


 

जीवनाशीं, विचारांशीं आणि भावनांशीं संबंधित आहेत म्हणून किंवा त्यांचें कल्याण साधणें अधिक बरें असें आपल्या अहंकाराला वाटतें म्हणून सुद्धां कांहींहि गोष्ट करतां कामा नये. अशा रीतीनें कर्म केलें व या दृष्टीनें पाहिलें, तर सर्व कर्में आणि अखिल जीवन म्हणजे परमेश्वराच्या विराट विश्वसत्तेच्या असीम मंदिरांत आपण त्याची केलेली दैनंदिन सक्रिय पूजा आणि सेवा होईल.

*

      श्रद्धा, ईश्वरावर भार, दिव्य शक्तीला आत्मसमर्पण आणि आत्मदान या गोष्टी आवश्यक आणि अनिवार्य आहेत. परंतु आलस्य, दुर्बलता आणि हीन प्रकृतीच्या प्रेरणांच्या आहारी जाणें या गोष्टी, भगवंतावर भार टाकल्यामुळें समर्थनीय समजूं नयेत. या निर्भरतेच्या बरोबरच अविरत अभीप्सा असली पाहिजे आणि परम सत्याच्या मार्गामध्ये जें जे आड येईल त्याचा सतत त्याग केला पाहिजे. भगवंताला आपण केलेलें समर्पण म्हणजे आपल्या स्वतःच्याच वासनांना किंवा हीन प्रवृत्तींना वा स्वतःच्या अहंकाराला किंवा भगवंताचें मिथ्या स्वरूप धारण करणाऱ्या अज्ञान आणि अंधःकार यांच्या शक्तीला शरण जाण्याची संधि, बहाणा किंवा निमित्त ठरूं देऊं नये.

*

      लढाईच्या खेळांत तळपणारी तलवार, सूं सूं करीत आपल्या लक्ष्यावर उडी घेणारा बाण, आकाशाच्या अवकाशांत भोवळ आणण्यासारख्या फेऱ्या घालीत राहिलेली पृथ्वी, अनंत काळ भ्रमण करीत असलेला, दाहक, प्रकाशक, प्रचंड तेज विश्वभर फेंकीत फिरणारा सूर्य यांना आपल्या स्वाभाविक क्रिया करण्यांत महान् आनंद असतो. त्यांच्याप्रमाणें

पान क्र. १२


 

ईश्वराच्या हातांतील जाणीवयुक्त यंत्र या नात्यानें तूं आपल्या स्वभावनियत कर्मातील आनंद लुटावास हेंच योग्य आहे. मला निर्माण करा असें तलवार सांगत नाहीं. वापरणारा तिला कसाहि वापरूं दे, त्याला ती आडवी येत नाहीं, वापरून मोडून गेली तरी त्याचें तिला दुःख नाही. तलवारीला तिची घडण चालली असतां, तिचा वापर चालला असतां, तिला बाजूला ठेवून दिलें असतां, तिला मोडून टाकली असतां -- सर्व स्थिति-गतींत सर्वत्र सारखाच आनंद असतो. असा सर्वत्र समान आनंद मिळविण्याची किल्ली तूं शोधून काढ.

*

      ईश्वराचा निःश्वास तुझा प्रेरक प्राण व्हावा, त्या ईश्वरी प्राणशक्तीच्या जोरावर तुझ्या कर्माचा रथ चालावा. तूं वादळाच्या गतीबरोबर उडणाऱ्या वाळल्या पानाप्रमाणें व्हावेंस; ईश्वराच्या हातांत तूं स्वतःला सर्वस्वीं द्यावेंस, आणि त्याच्या प्रेरणेनुसार प्रहार करणाऱ्या तलवारी प्रमाणें व लक्ष्यावर उडी घेणाऱ्या बाणाप्रमाणें तूं वागावेंस. तुझें मन यंत्रातील स्थितिस्थापक पोलादी पट्टीप्रमाणें, तुझी प्राणशक्ति वाफेनें गतिमान् होणाऱ्या दट्ट्याप्रमाणें, तुझें काम वस्तूला विशिष्ट आकार देणाऱ्या यांत्रिक पोलादी रंध्याप्रमाणें असावें. ऐरणीवर पडणारा घण, कारखाना चालवणारें वेगवान् गतियंत्र, व उच्च आवाजानें दवंडी देणारें रणशिंग, तालबद्ध नादलहरींनीं आसमंत भरून टाकतात, त्याप्रमाणें तुझी वाणी तालबद्ध, उंच, घुमणारी व घणाघाती होऊन तिनें ईश्वरी सामर्थ्याच्या घोषणेनें आसमंत भरून टाकावा. तुझ्या प्रकृतिधर्मानुसार जें नियतकर्म असेल, तें तूं ईश्वराच्या हातांतील यंत्राप्रमाणें करावेंस हीच एक मुख्य गोष्ट आहे.

*

पान क्र. १३


 

      पहिली गोष्ट तुला शिकावयाची ती ही कीं, तूं ईश्वराला आपला मालक म्हणून स्व-खुशीनें मान्य करावेंस आणि तूं स्वतःला कर्मसाधन मानावेंस. हा “तूं स्वतः” म्हणजे याला तूं ''मी'' म्हणतोस ती बाह्यवस्तु. ह्या बाह्य वस्तूंत विशिष्ट ढाचाचें तुझें मन, विशिष्ट प्रेरक शक्तींचा तुझा प्राण, विशिष्ट आकाराचें, नाना गुंतागुंतीच्या रचनांनी युक्त असें तुझें देहयन्त्र या सर्व गोष्टी येतात. या बाह्य वस्तूला तुझ्यातील कामगार किंवा मालक समजण्याची चूक तूं करूं नकोस. ही वस्तु केव्हांहि कामगार किंवा मालक होऊं शकत नाहीं. तूं ईश्वराचें कर्मसाधन आहेस आणि हें स्थान नम्रपणें पण अभिमानानें, भक्तिमय सेवाभावानें तूं स्वीकारावेंस. मालकाचें, ईश्वराचें निर्दोष व पूर्ण कार्यक्षम साधन होण्यापेक्षा अधिक गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्ट व्यक्तीला (मन-प्राण-देहरूप 'मी' ला) असूं शकत नाहीं.

*

      तेव्हां 'तूं' प्रथम तुला सांगितलेलें काम बिनतक्रार करायला शिकावेंस. कोठें प्रहार करावयाचा हें तलवार ठरवीत नाहीं; बाण तो फेंकण्यांची दिशा किंवा लक्ष्य ठरवीत नाहीं; यंत्राचे विभाग आपल्या विविध क्रियांनीं अमूकच पदार्थ निर्माण व्हावा असें ठरविण्याचा आग्रह धरीत नाहींत तसेंच तूंहि कर. तें काम तुझ्यांतील प्रकृतीचें आहे, प्रकृति हा तुझ्या मालकाचा, ईश्वराचा, तुझ्या ठिकाणचा कामगार आहे, तो कामगार काय ठरवावयाचें तें ठरवील. त्यानें ठरविलेलें काम तूं त्याचें सचेतन, चैतन्ययुक्त साधन या नात्यानें करावयाचें आहेस; तूं या कामगाराच्या, तुझ्या प्रकृतीच्या विशुद्ध धर्माला ओळखून जितका व जितक्या लवकर त्या धर्मानुसार वागण्यास शिकशील तितकें व तितक्या लवकर तुझ्याकरवीं घडणारें काम निर्दोष आणि सर्वांगपूर्ण असें होईल. उलट 'तूं' म्हणजे, तुझ्या मन-प्राण-शरीरानें, 

पान क्र. १४


 

कर्मसाधनरूप 'तूं' तें विशुद्ध प्रकृतिरूप कामगाराचें न ऐकता, बंड करून आपलाच हेका चालविण्याचें ठरविलें तर तुझ्याकरवीं घडणारें काम बिघडून मात्र जाईल.

*

      आमच्या मनाची वृत्ति अशी असावी :- “या माझ्या मनांत आणि शरीरांत ईश्वरी शक्ति काम करीत आहे; सर्व माणसांत काम करते तीच ईश्वरी शक्ति माझ्यात काम करीत आहे; सर्व प्राण्यांत, वनस्पतींत, धातूत काम करते तीच ईश्वरी शक्ति माझ्यात काम करीत आहे; जाणीवयुक्त आणि प्राणयुक्त वस्तूंत आणि अचेतन प्राणशून्य दिसणाऱ्यासुद्धां वस्तूंत जी ईश्वरी शक्ति काम करते तीच माझ्यांतहि कार्य करीत आहे.” ही दृष्टि, ही वृत्ति व्यापक आहे;. एकच ईश्वर सर्वत्र काम करीत आहे; सर्व जग त्याच्या दिव्य कृतीचें आणि त्याच्या क्रमश: आविष्काराचें समान दर्जाचें साधन आहे ही दृष्टि, ही वृत्ति आमच्या अनुभवाला सर्वत्र व्यापून राहिली, तर आमचा राजसिक अहंकार आणि आमचा सात्विक अहंकार देखील आमच्यांतून, आमच्या प्रकृतींतून नाहींसा होण्यास या वृत्तीचीं खूप मदत होईल.

*

      शारीरिक कर्म हें मानसिक विकासकार्यापेक्षां कमी किमतीचें आहे हें खरें नाहीं. असें प्रतिपादन करणें हा बुद्धीचा उद्धटपणा आहे. कोणतेंहि भगवत्प्रीत्यर्थ केलेलें कर्म सारखेंच दिव्य आहे. भगवंताकरितां जर शरीरकष्टाचें काम केलें, तर तें स्वतःच्या विकासाकरिता, कीर्तीकरतां अथवा मानसिक संतोषाकरितां केलेल्या मानसिक कर्मापेक्षां अधिक दिव्य आहे. मानसिक विकासासाठीं शारीरिक कर्माचा त्याग करण्याची कल्पना ही

पान क्र. १५


 

मानसिक अहंकारांतून उद्भवलेली असते. तात्पुरता शारीरिक थकवा आला असेल, तर विश्रांति घेतली पाहिजे. पण शारीरिक शक्ति पुनश्च भरून काढण्याच्या उद्देशानेंच केवळ ही विश्रांति घेतली पाहिजे.

*

      धर्म जर आचरणांत आणला नाहीं, तर त्याचा कांहींच उपयोग नाही अशी भारताची दृष्टि आहे केवळ आचरणांतच नव्हे, तर तो अखिल जीवनांतच उतरविला पाहिजे. आपला समाज, आपले राजकारण, आपले वाङ्मय, आपलें शास्त्र, आपली वैयक्तिक दानत, आपले हितसंबध व आकांक्षा या सर्वाना धर्म प्राणभूत असला पाहिजे, या सर्वांची घडण या धर्मानुसार झाली पाहिजे या धर्माचें हृद्गत आकलन होणें, एक सत्य म्हणून त्याची अनुभूती घेणें हा धर्म ज्या उच्च भावनांच्या पातळीपर्यंत पोहोंचवितो त्या अनुभवणें व आचरणद्वारां जीवनांत व्यक्त करणें हा आमच्या दृष्टीनें कर्मयोगाचा खरा अर्थ.

*

पान क्र. १६


 

श्रीमातृवचन मुक्तावली

राधेची प्रार्थना

 

      माझ्या अस्तित्वाचा स्वामी, माझा देवाधिदेव तूंच याचें प्रथमदर्शनींच मला ज्ञान झालें. तूं माझ्या या आत्मदानाचा स्वीकार कर. तुझेंच आहेत माझे सर्व विचार, माझ्या सर्व भावना, माझ्या हृदयींचे सारे भाव, माझ्या सर्व संवेदना, माझ्या जीवनांतील सर्व क्रिया, माझ्या शरीरांतील पेशीन् पेशी, माझ्या रुधिराचा थेंब अन् थेंब. मी सर्वस्वी, सर्वांगांनीं केवळ तुझी आहे. निःशेषतया तुझीच. मीं जें व्हावे असें तूं इच्छिशील तें मी होईन. जीवन अथवा मृत्यु, सुख वा दुःख, हर्ष अथवा क्लेशभोग यांतील जें कांहीं तूं माझ्यासाठीं पसंत करशील तें तुझ्याकडून आल्यामुळें मला स्वागतार्हच वाटेल. तुझ्याकडून मिळालेली कोणतीहि देणगी, परम अत्यानंद घेऊन येणारी दिव्य देणगीच, दिव्य प्रसादच मला वाटेल.

*

      प्रत्येक व्यक्तीनें आपलें स्वतःचें स्थान, म्हणजेच सर्वांच्या मेळांव्यांत ती व्यक्तीच घेऊं शकेल. दुसरें कोणीहि घेऊं शकणार नाहीं

पान क्र. १७


 

असें स्थान शोधून काढलें पाहिजे. त्यानें सर्वस्वीं त्याच कार्यांला वाहून घेतले पाहिजे. पण, अखिल विश्वाच्या वृंदवादनामधील आपला केवळ एक स्वर असला, तरीहि वृंदवादनाच्या संगीतामधील तो एक अपरिहार्य स्वर आहे आणि तो स्वर योग्य वेळींच व योग्य प्रकारें कसा वाजतो यावरच संपूर्ण संगीताचे मूल्य अवलंबून आहे हेंहि प्रत्येक व्यक्तीनें लक्षांत धरलें पाहिजे.

*

      तुम्ही त्यांचा स्वीकार केल्यानेंच एखाद्या उणीवेची, दोषांची जाणीव होऊनहि ती उणीव भरून काढण्याची शक्ति तुम्हांला ताबडतोब मिळत नाहीं. एखादी गोष्ट असावयास नको असें कळत असूनहि ती चालूं ठेवणें हें दुर्बलतेचें लक्षण आहे; आणि अशी दुर्बलता कोणत्याहि कडक साधनेमध्यें कधींहि चालूं शकणार नाहीं. याचा अर्थ हा कीं, तुमच्या ठिकाणीं पुरेसें इच्छाबळ नाहीं; आणि त्यामुळें तुम्ही अप्रामाणिक होत आहांत. एखादी गोष्ट असूं नये असें ज्या क्षणीं तुम्हांस कळतें, त्या क्षणीं तुम्हीं तुमचे स्वामी झालें पाहिजे आणि ती गोष्ट निघून गेली पाहिजे. कारण ज्ञान आणि सामर्थ्य तत्त्वतः एकच आहेत. -- म्हणजेच, तुमच्या प्रगतीच्या केन्द्रवर्ती इच्छेशीं विरुद्ध असलेली, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याहि भागांतील इच्छेची दुर्बलता, संकल्प. शक्तीची उणीव तुम्हीं मान्य करतां कामां नये, स्वीकारता कामां नये; ती तुम्हांला शक्तिहीन करते, भीरु करते, ज्या अनिष्टाचा नाश तुम्हीं करावयास पाहिजे, त्याच्यासमोर तुम्ही निर्बळ ठरतां.

*

      आपण आपली स्वतःची जाणीव व्यापक केली पाहिजे; अधिक

पान क्र. १८


 

व्यापक दृष्टिकोनांतून घटनांकडे पाहिलें पाहिजे. एखाद्या प्रसंगाला तुम्हांला तोंड द्यावयाचें आहे, एखाद्या मोठ्या संकटाशीं सामना देणें भागच आहे असा क्षण आला आहे, तर त्यावेळीं तुम्ही हा विचार करायला सुरुवात करा कीं, आजपर्यन्त हजारों, लाखों वर्षांचा काळ लोटून गेला आहे आणि यापुढेंहि हजारों वर्षाचा काळ आहे. या विचारानें अत्यंत कठीण वाटणारा क्षण अगदीच क्षुल्लक असल्याचा अनुभव तत्काळ तुम्हांला येईल. याकरितां फार उच्च अशी अवस्था प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाहीं. फक्त अनंत काळापासून घडत असलेल्या घटना, पुढें होणाऱ्या आणि चालूं काळांतील, चालूं क्षणीं घडत असलेल्या घटनांचा तुम्ही नुसता विचार करा. कोणीहि शहाणा माणूस सहज उद्‌गार काढील की, “हो, खरेंच. अगदींच क्षुद्र गोष्टीला मी फारच महत्त्व देत आहे!''

*

      सदिच्छेद्वारां मनुष्य अनेक गोष्टी बदलूं शकतो; परंतु ती अगदीं पवित्र व निर्मळ अशी सदिच्छा असावयास पाहिजे. हें अगदीं स्पष्ट आहे कीं, एकादा पूर्ण शुद्ध सद्विचार अथवा प्रार्थना जर जगांत पसरविली, तर ती कार्यकारी होऊं शकते. परंतु जेव्हां मानवी दृष्टीतून विचार जाऊं लागतो, तेव्हां तो पूर्ण शुद्ध व सद्विचार म्हणून कुठें असतो? तो निकृष्ट होऊं लागतो. तुम्ही जर स्वतःमध्यें आंतरिक चेतना व ज्ञान यांच्या प्रयत्नानें एखाद्या वासनेचें खऱ्या अर्थानें उल्लंघन, लय व निर्मूलन करूं शकाल आणि त्याप्रमाणें आंतरिक सदिच्छा, चेतना, प्रकाश व ज्ञान यांच्या द्वारां वासना नष्ट करण्यास समर्थ व्हाल, तर तिचें शमन केल्यानें व्यक्तिश: जेवढे सुखी तुम्ही झालां असतां त्यापेक्षां शेंकडों पटींनीं अधिक सुखी तुम्ही व्हाल; आणि नंतर त्याचा आश्चर्यकारक परिणाम

पान क्र. १९



दिसून येईल. जगावर त्याचा इतका प्रभाव पडेल कीं, त्याची तुम्हांला कल्पनाच करतां येणार नाहीं. तो प्रभाव पसरत जाईल. कारण तुम्ही निर्माण केलेलीं स्पंदनें प्रसरण पावत राहतील. हिमराशी ज्याप्रमाणे वाढत जाते, त्याप्रमाणें हा प्रभाव वाढत जाईल. तुमच्या स्वभावांत, तुमच्या जीवनांत तुम्ही जो विजय प्राप्त करतां, मग तो किती कां लहान असेना, त्यामुळें त्याच तऱ्हेचा विजय जगांत मिळविण्याची दुसऱ्यांच्या बाबतींतहि शक्यता निर्माण होते.

*

      जेव्हा तुम्ही योगमार्गाचा स्वीकार करतां, तेव्हां जुने मनोमय मनोरे आणि वासनाविकारांचे तुरुंग पार मोडून तोडून टाकण्यास तुम्ही तयार असलें पाहिजे. योगमार्गावरून चालावयाचें, तर पोकळ अवकाशामध्यें निराधार लटकतें, लोंबतें राहण्याची तुमची तयारी हवी. तुमची श्रद्धा हाच तेवढा तुमचा आधार. दुसऱ्या कोणत्याहि गोष्टी तुम्हाला हात देणें शक्य नाहीं. भूतकाळांतील 'तुम्ही' पार विसरून गेलें पाहिजे. भूतकाळांतील तुम्ही ज्या ज्या गोष्टींना कवटाळून बसला असाल, त्या सर्व विसरल्या पाहिजेत. तुमच्या जाणिवेंतून त्या मुळासकट उपटून टाकल्या पाहिजेत. तुम्हीं सर्व दृष्टीनें नवीन बनलें पाहिजे. तुमचा नवजन्मच झाला पाहिजे. सर्व प्रकारच्या रूपांच्या बंधनांतून तुम्हीं मोकळें झालें पाहिजे. आपण काय 'होतों' याचा विचार करूं नका, तर तुम्हाला पुढें 'काय' व्हावें अशी तुमची अभीप्सा आहे त्याचाच विचार करा. जें काय व्हायचें आहे ते सर्वांगांनीं व्हा. भूतकाळाकडे पाठ करून भविष्यकाळाकडे सरळ नजर रोखा. तुमचा धर्म, तुमचा देश, तुमचे कुटुंब सारे सारे एका 'भगवच्चरणीं' च वसत आहे.

*

पान क्र. २०


 

      सूर्यास्तानंतर सर्वत्र निवांत झाल्यावर, क्षणभर बसून सुष्टीशीं तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करा. वृक्ष-मुळांच्याहि खालपासून निघून वृक्षांच्या तंतूततूंमध्ये प्रवाहित होऊन, अगदीं उंचावर विस्तारलेल्या शाखोपशाखांच्या अगदीं शेंवटच्या टोंकापर्यंत जाऊन पोहोंचणारा, उत्कट प्रेम आणि उत्कट इच्छा यांचा एक प्रवाह तुमच्या अनुभवास येईल. ज्यायोगें प्रकाशमयता आणि सुख प्राप्त होतें त्याबद्दलची, जो प्रकाश आतां पृथ्वीतलावरून अदृश्य झाला आहे, परंतु जो पुनः परत यावा असें वाटत असतें त्याबद्दलची ती एक उत्कट इच्छा असते. ही उत्कंठा अतीव शुद्ध आणि प्रबल असते; इतकी कीं जर का वृक्षांच्यांतून, वर उत्थापन करीत असलेली उत्कंठा अनुभवतां आली, तर या जगांत अवतीर्ण न झालेल्या शांति, प्रकाश, प्रेम याविषयींची प्रार्थना तुमच्या मधूनहि बाहेर पडेल आणि तीबरोबर तुमच्या साऱ्या अस्तित्वाचें उत्थापन होत असलेलें तुमच्या अनुभवास येईल. खऱ्या दिव्य प्रेमाच्या या विशाल आणि विशुद्ध स्वरूपाशीं तुमचा जरी एकदां संबंध आला, हा संबंध तुम्हीं जरी अल्पकाळ, अल्पांशानेंहि अनुभवला, तरी मूळ दिव्य स्वरूपास मानवी वासनेमुळें किती हिणकस स्वरूप प्राप्त झालें आहे हें तुम्हांस प्रत्यक्षच दिसेल.

*

      किती काळ ध्यानार्थ वेंचला हे आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप नाहीं. तुमच्या प्रगतीचे खरें माप हें कीं, ज्यावेळीं तुम्हांला ध्यान करायला मुळींच प्रयत्न करावे लागत नाहींत, उलट ज्यावेळीं ध्यान थांबविण्यासच तुम्हाला प्रयास पडतात, ध्यान थांबवणें कठीण होऊन जातें, भगवंताविषयींचा  विचार बंद करणें अशक्य होऊन बसतें, सामान्य जाणिवेच्या भूमिकेवर खालीं येणेंच मुष्कील होऊन जातें, भगवंतावर एकाग्रता करणें

पान क्र. २१


 

ही जेव्हां तुमच्या जीविताची एक आवश्यकता होते, त्यावांचून तुमचें जेव्हां चालतच नाही, -- कोणताहि उद्योग करतांना जेव्हां तुमची ही स्थिति  स्वाभाविकपणेंच रात्रंदिन सतत कायम राहील, तेव्हां तुम्ही निश्चित प्रगति केली आहे, खरोखरी तुमची प्रगति होत आहे असें समजा. तुम्ही ध्यानार्थ बसा वा इकडेतिकडे हिंडा किंवा कांहीं का करीत रहा, तुमच्याकडून कशाची अपेक्षा असेल, तर ती म्हणजे जाणिवेची, जागृतीची. एकमेव आवश्यकता हीच आहे; भगवंताचें अखंड अनुसंधान, अखंड भान राखणें.

*

      एकामागून एक चढत्या, वाढत्या, पुढच्या पायऱ्यांवर सतत चढत चढतच मानवी जीवन हें प्रगत होत असतें. एका दृष्टीनें पाहतां, जसजसे तुम्ही प्रगत होत जातां, तसतशा, एकदां जुन्यापुराण्या वाटूं लागलेल्या कांहीं गोष्टीच स्वतः अगदीं नवीन स्वरूप धारण करतात. मनुष्यानें पुढे पुढें गेलें पाहिजे, अधिक उच्च गेलें पाहिजे; सुख व वैयक्तिक लाभ यांच्या वखवखलेल्या भुकेपेक्षां उंच चढलें पाहिजे. पण हें सर्व शिक्षेच्या भीतीनें अथवा परलोकीं सोसाव्या लागणाऱ्या दंडाच्यासुद्धां भयानें नव्हे, तर सौंदर्यदर्शी नवदृष्टीच्या विकासामुळें, सत्य आणि प्रकाश यांच्या तृष्णेमुळें केलें पाहिजे. स्वतःला विशाल व प्रकाशयुक्त केल्यानें, स्वतःमधील उन्नतीची ज्योत प्रज्वलित केल्यानेंच केवळ, आंतरिक शांति चिरंतन सुख यांची प्राप्ति होऊं शकेल, हें समजून मनुष्यानें पुढे पुढें गेलें पाहिजे. मनुष्यानें उंच चढलें पाहिजे आणि विशाल झालें पाहिजे. उंच चढा; स्वतःस विशाल करा.

*

      हे प्रभो! तूं प्रेममय आहेस. आणि प्रत्येक विचारामध्यें आणि

पान क्र. २२


 

      प्रत्येक हदय-गाभाऱ्यामध्यें अगदीं खोलवर तुझ्याच प्रेमाचा प्रकाश आहे. तुझें रूपांतरकार्य पूर्णतेस ने : आम्हांला ज्ञानपूर्ण बनव. अजूनपर्यंत बंद असलेलीं द्वारें उघड, क्षितिज विशाल कर, सामर्थ्य प्रस्थापित कर, आमच्या अस्तित्वामध्यें एकत्व निर्माण कर, तुझ्या परम आनंदाचे सहभागी आम्हांस बनव; म्हणजे इतर सर्वांना त्यामध्यें वांटेकरी होण्यास आम्ही सहाय्य करूं शकूं. अखेरच्या आंतरिक आणि बाह्य विघ्नांवर आम्हांस विजय मिळवितां येऊं देत आणि अंतिम अडचणी ओलांडता येऊं देत. तुला केलेली उत्कट आणि खरीखुरी प्रार्थना कधींच विफल झालेली नाहीं; आमच्या प्रत्येक हांकेला तुझ्या उदारपणामुळें प्रत्युत्तर मिळतें; आणि तुझी करुणा तर अपार आहे!

      हे दिव्य प्रभो, येथील विसंवाद व संघर्ष यांवर तुझा प्रकाश पाडून त्यांतून एक नवीन जग उदित होऊं दे. ज्याची आतां पूर्वतयारी चालूं आहे तें साध्य करून, अशी एक नवमानवजात निर्माण होऊं दे कीं जी तुझ्या नूतन उदात्त संकल्पाची परिपूर्ण अभिव्यक्ति ठरेल.

*

      जेव्हां तुम्ही वासनापरित्याग करतां त्याक्षणी तुम्हांला वासनातृप्तीपेक्षां अधिक आनंद कां होतो? कारण त्याक्षणीं तुम्ही तुमच्या आन्तरात्म्याशीं एकप्रकारें एकत्व अनुभवतां. उलट जेव्हां एखाद्या वासनेची तृप्ति तुम्ही करून घेतां तेव्हां कोठेंतरी परिणामीं विपाकरूप कडवटपणा निर्माण झालेला असतो. अशा तऱ्हेचा कडवटपणा मागें ठेवून न जाणारी अशी कोणतीच वासना असणार नाहीं. अति गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जसा त्याचा तोंडास वीट येतो, एकप्रकारचा कडवटवणा राहतो, तसेंच या वासनातृप्तीच्या बाबतींत असते. म्हणून वासना दूर टाकून देण्याचा

पान क्र. २३


 

अगदी मनापासून तुम्हीं प्रयत्न केला पाहिजे. वासना फेंकल्यासारखं वरवर करावयाचें आणि मनाच्या कुठल्यातरी कोंपऱ्यात तिला जागा करून द्यावयाची, असें मात्र करतां कामां नये. तसें केलें तर निश्चितपणें तुम्हांला दुःखांत पडावें लागेल.

*

      तुमच्या विपन्नावस्थेची कल्पना करण्याइतकें किंवा तुमच्या वेदनांचे परिणाम सहन करण्याइतकेंहि धैर्य तुमच्याजवळ नाहीं, म्हणून तुम्ही रडत आहांत, दुःख भोगत आहांत, भयकंपित झाला आहांत काय? तर हें पहा! अशी कोणतीच निशा नाहीं, जिच्या अंती उषेचा उदय होत नाहीं; अंधःकार जेव्हां अति घनदाट होतो, त्याच वेळीं उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते. सुर्यप्रकाशानें ज्याचा विलय होणार नाही असें कोणतेंच धुकें नसतें आणि त्याच्या किरणांनीं ज्याची कड सोनेरी होत नाहीं असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रु आहे, जो कधींच सुकणार नाहीं? असें कोणतें तुफान असतें कीं ज्याच्या शेवटीं विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनीं चमकणार नाहीं? सूर्यप्रकाशानें वितळणार नाहीं असें बर्फ कुठें आहे का? किंवा असा कोणता शिशिर ऋतु आहे कीं ज्याची परिणति उल्हसित वसंतामध्ये होणार नाहीं?

*

      आपण असेंहि म्हणूं शकू कीं अविरतपणें विकसत राहणें, वाढत राहणें हेंच खरेंखुरें शाश्वत तारुण्य आहे. क्षमता वाढत रहावयाच्या, अनेक संभाव्यता एकसारख्या फुलत रहावयाच्या, कर्मक्षेत्राचा सतत विकास होत रहावयाचा, जाणिवेचेंहि क्षेत्र विस्तृत होत जावयाचें आणि

पान क्र. २४


 

बारीक बारीक तपशिलाच्या गोष्टींतहि सतत प्रगति करत रहावयाचें याचेंच नांव निरंतरचें तारुण्य.

*

      ''मला जें जें माहीत नाहीं तें सारें मला उद्यां समजायला लागूं दे. मला जें जें करतां येत नाहीं तें मला अधिकाधिक करण्यास यायला लागूं दे, अशी माझी प्रार्थना आहे.'' असें प्रत्येक दिवशीं म्हणत जा.

      जगांतील नाना दुःखांनीं जर तुम्ही वेढलेलें असाल, तुमचे मित्र दुःखी कष्टी असतील, तुमच्या आप्तेष्टांमागें दुःखभोग लागले असतील, तुम्ही अडचणींत सांपडलें असाल, तर अशी प्रार्थना करावी -- ''प्रकट होणाऱ्या भावी दैवी पूर्णतेप्रत माझें संपूर्ण भान, माझी संपूर्ण चेतना समग्रतया उंचाऊं दे. ज्यामुळें जग इतकें दुःखी होऊन गेलें आहे तें हें सारे अज्ञान उज्ज्वल ज्ञानांत रूपांतरित होवो! असदिच्छेवर ज्ञानाचा प्रकाशझोत पडून तिचें सदिच्छेंत रूपांतर होवो.''

      तुमची कार्यक्षमता आणि तुमची समजशक्ति यांच्या मानानें किंवा हृदयाचे सारे भाव ओतून तुम्ही जितकी इच्छा कराल त्या मानानें तसें प्रत्यक्ष घडून येईल आणि ही इच्छा प्रार्थनेचें स्वरूप घेईल. तुमच्याहून ज्ञानपूर्ण, कार्यक्षम आणि सामर्थ्यसंपन्न शक्तीनें सहाय्य करावें अशी तुम्ही प्रार्थना कराल..... आणि अशा प्रार्थना खरोखर किती बरें सुंदर असतील!

*

      तुम्ही स्वतःला म्हणूं शकाल, ''मला स्वतःला मी आज कसा आहें, याची नीटशी कल्पना नाहीं. तरीपण ज्या बऱ्यावाईट वृत्ति-प्रवृत्तींचा व तत्वांचा मी घडलो गेलों आहें, त्यांत चांगला बदल घडवून आणण्याचा कार्यभाग मजकडे आलेला दिसतो आणि जर तो कार्यभाग माझ्या

पान क्र. २५


 

शक्तीप्रमाणें व पात्रतेप्रमाणें अधिकांत अधिक चांगल्याप्रकारें उचलून तो मी शेवटास नेऊं शकलों, तर माझ्याजोगतें सर्वोत्कृष्ट असेंच माझें जीवित-कर्तव्य तेंच कदाचित् असेल.'' अशा रीतीनें स्वतःवर संस्कार करण्याची शक्यता तुमच्या बाबतींत दिसत असेल, तर तुम्ही खरोखरच मोठ्या थोर कामाचा थोर आरंभ केला आहे असें होईल; शिवाय ती कामगिरी तुमच्या शक्तीच्या, तुमच्या ठिकाणच्या संभाव्यतेच्या बाहेर नाहीं. कामगिरीच्या भाराखालीं वांकून जाण्याचाहि त्यांत संभव नाहीं. तुमच्या समोरचें कार्यक्षेत्र तुमच्या दृष्टीच्या शक्तीइतकेंच विस्तारलें व तुमच्या शक्तीच्या मर्यादेंतलेंच असून, त्यांतील संकीर्णता व संमिश्रता व गहनताहि येवढीच आहे कीं ती तुम्ही हाताळूं शकाल. तुमच्या शक्तीप्रमाणें व बुद्धीच्या पात्रतेस अनुसरूनच ती गहनता वाढत जाणारी आहे. त्यामुळें तुम्हांला, अज्ञात जगांत जाऊन नवनवीन प्रांत आपण हस्तगत करीत आहोंत असेंहि वाटेल; आणि तुमचा सर्व प्रवास आनंदांत व उत्साहात चालेल.

*

      काम करणें ही गोष्ट इतकी सोपी नाहीं. असें समजू नका कीं, कसेंतरी काम संपवून टाकणें म्हणजे खऱ्या अर्थानें काम केल्यासारखें झालें. सामान्यपणे ज्याला 'साधना' म्हणतात, ती साधना करण्यापेक्षां कर्म करणें हें पुष्कळच अधिक कठीण आहे. ध्यानाच्या वेळीं तुमची जाणीव उंचावते आणि तेथें प्रकाश आणि शांति यांच्या अवस्थेंत स्थिरावते. खऱ्या अर्थानें कर्म करावयाचें, तर ही गोष्ट तर करावयाची असतेच आणि पुनः वर त्याशिवाय अधिक कांहीतरी करावयाचें असतेंच; आणि उच्चांत उच्च भूमीवर पोंचून तेथून, तेथील प्रकाशमय, शांतिमय अशी चेतनेची अवस्थाहि खालीं आणून ती तुमच्या नित्याच्या कामांत प्रकट करावयाची असते; तुम्हांला कोणतेंच काम निरर्थक व क्षुल्लक असें नाहीं.

*

पान क्र. २६


     

      तुमच्या कामांत सुव्यवस्था व सुसंवाद या गोष्टी असल्या पाहिजेत. जरासा जरी विसंवाद, अव्यवस्था किंवा गोंधळ तुमच्या कामांत आढळला, तर त्या कर्मानें महासरस्वति संतुष्ट होणार नाहीं. अगदीं निरर्थक वाटणारी गोष्ट असली, तरी ती सुद्धां पूर्ण निर्दोष अशी केली पाहिजे. स्वच्छता, सौंदर्य, सुव्यवस्थितपणा यांकडे दृष्टि ठेवून ती उत्तम केली पाहिजे. उदाहरणार्थ, खोली झाडण्याचे काम करतांनाहि ती उत्तम शस्त्रक्रियागृहाइतकी स्वच्छ करण्याचा तुमचा यत्न असला पाहिजे.

*

      साधना मार्गावर चालण्यासाठी दुर्दम्य वीरता असली पाहिजेच. या हीन, क्षुद्र आणि अशोभनीय वृत्तीनें म्हणजेच भीतीनें तुम्हीं कधींहि पाठ फिरवितां कामां नये.

      दुर्दम्य धैर्य, पूर्ण अंतःकरणपूर्वकता, सर्वांगपूर्ण आत्मदान.....इतके कीं तुम्ही कांहींहि मोजमाप ठेवीत नाहीं, नफानुकसानीचा विचार करीत नाहीं, कांहीं मोबदला मिळेल म्हणून तुम्ही देत नाहीं तुमची श्रद्धा स्वयंसिद्ध असते, तिच्या सिद्धीसाठीं कोणत्याहि प्रमाणांची आवश्यकता नसते. या मार्गावर अग्रेसर होण्यास या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. केवळ यांचमुळे सर्व धोक्यांपासून तुमचे रक्षण होऊं शकेल.

*

      परमेश्वर अनंत आणि अगणित आहे; अर्थातच त्याच्याकडे जाण्याचे मार्गहि अनंत आणि अगणित आहेत; आणि ज्या मार्गानें एकादा परमेश्वराकडे जाईल त्यावर त्याला परमेश्वराकडून काय मिळावयाचें नि त्याचें कसें ज्ञान व्हावयाचें हें अवलंबून आहे.

      एकाद्या भक्ताला प्रेमळ आणि माधुर्यपूर्ण परमेश्वर भेटतो, तर विद्वान् माणसाला परमेश्वर ज्ञानी आणि शहाणा दिसतो. ज्याला भीति असते

पान क्र. २७


 

त्याला परमेश्वर कडक वाटतो आणि ज्याचा त्यावर विश्वास असतो त्याला परमेश्वर सखा आणि पाठीराखा वाटतो... आणि अशाच अनंत प्रकारच्या शक्यता असूं शकतात.

*

      परमेश्वराशी तादात्म्य पावण्याच्या, युक्त होण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे हृदयांत चित्त एकाग्र करावयाचें आणि तेथें त्याची उपस्थिति अनुभवण्यासाठी खोल खोल जावयाचें; दुसरी पद्धत म्हणजे, स्वतः जाऊन त्याला आलिंगन द्यावयाचें. एकादें बालक जसें आईच्या कुशींत जाऊन बिलगतें तसें खऱ्या शरणभावानें देवास बिलगावयाचें. या दोन्हींमधींल पहिली मला अधिक सोपी वाटते.

*

      अचंचल मन आणि नीरव मन यांमध्यें समजुतीचा घोंटाळा होऊं देतां कामां नये. मनास स्तब्ध करून, त्याच्या नित्याच्या हालचाली तुम्ही बंद कराल; तरीपण बाहेरून येणाऱ्या कल्पनातरंगांना आंत शिरण्यास तेथें वाट मोकळी असूं शकेल आणि त्यायोगें ही स्तब्धता नाहींशी होऊं शकेल. मनाला पूर्णपणें शांत करावयाचें असेल, तर त्याच्या नित्याच्या हालचाली नुसत्या थांबवून पुरणार नाहीं, तर त्याबरोबरच इतरांच्या मनांतून येणाऱ्या तरंगांना अडवण्यासाठीं मनाचीं द्वारें बंद केली पाहिजेत. हीं गोष्ट कांहीं सोपी नाहीं.

      शिवाय जाणीवशक्तीनें घडून आलेलें कार्य आणि मनाचें कार्य यांतील भेदहि जाणण्यास शिकलें पाहिजे. एखाद्याला एखाद्या अनुभूतीविषयीं जाणीव होऊं शकेल, पण ती जाणीव कांहीं स्वतः एखाद्या किंवा अनेक विचारांचें रूप घेत नाहीं. मनानें पूर्णपणें स्तब्ध व निशब्द स्थितींत राहण्यासाठीं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे.

*

पान क्र. २८


 

      तुम्ही जें कांहीं करतां तें, केवळ शक्य तितकें चांगलें करून भागणार नाहीं, तर सतत पूर्णत्वप्राप्तीच्या तळमळीनें, उत्तरोत्तर अधिक चांगलें करण्याच्या उत्कंठेनें तुम्हीं तें केलें पाहिजे.

*

      तुमच्या वांट्याला जो कांहीं उद्योग वा काम आलें असेल तें तुम्ही प्रगतीची इच्छा धरून करा.

*

      ज्या ज्या वेळीं संधि येईल त्या त्या वेळीं जें अवघड काम असेल तेंच नेमकें निवडून तें करण्यानें मनःसामर्थ्य वाढतें व इच्छाशक्ति दृढ होते.

*

      तुम्ही जितके अधिक दुःखी कष्टी रहातां तितका शोकहि अधिक वाढतो व तितकेंच तुम्ही मजपासून अधिक दूर जातां. भगवंत कांहीं दुःखी नाहीं आणि म्हणून त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठीं साहजिकच सर्व प्रकारचा शोक आणि भावनाविवशतेचें दौर्बल्य तुमच्यापासून तुम्हीं अगदी दूर लोटून दिलें पाहिजे.

*

      प्रत्येकाकडून त्याच्याजवळ जें कांहीं आहे व तो जें कांहीं आहे तेवढेंच मागितलें आहे; अधिक कांहींहि नाहीं, पण कमीहि नाहीं.

*

      परमेश्वराकरितां काम करणें हें फार चांगलें; तो एक आनंद आहे. पण परमेश्वराबरोबर काम करणें हा त्याहिपेक्षा अनंत पटीनें गाढ व मधुर दिव्यानंद आहे.

*

पान क्र. २९


 

      एखादें काम सुरू करून तें अर्धवट सोडून दुसरें एखादें काम दुसरीकडे सुरू करावयाचें, ही संवय तितकीशी हितकारक नाहीं.

*

      नुसता प्रयत्न पुरेसा नाहीं; तुम्ही यशस्वीहि झालें पाहिजे.

*

      यश हें आपणांसमोरील ध्येय नाहीं. आपलें लक्ष्य आहे 'पूर्णत्व'. कीर्ति किंवा मानसन्मान आपल्याला मिळवावयाचा नाहीं; तर दिव्य आविष्कारासाठीं आपल्यालां तयारी करावयाची आहे.

*

      माझें तुला सांगणें आहे -- दुःखभोगाचें स्मरण आपलेंपणानें मनांत वागवूं नकोस, म्हणजे दुःख तुला सोडून जाईल. प्रगतीस दुःखभोगाची नेहमीं अत्यंत आवश्यकताच असते असें मुळींच नाहीं. अविचल आणि उल्हसित समभावांतूनच मोठ्यांत मोठी प्रगति केली जाते.

*

      धैर्यवान् हो आणि स्वतःविषयीं इतका विचार करीत बसूं नको. तुझा क्षुद्र अहंकार, तूं आपल्या सर्व विचारक्षेत्राचें केन्द्र केलेला आहेस त्यामुळेंच तूं इतकी दुःखी आणि असंतुष्ट आहेस. स्वतःस विसरून जाणें, हें सर्व प्रकारच्या अस्वास्थ्यावर मोठेच रामबाण औषध आहे.

*

      ज्या भावनाविवश माणसाचें स्वतःवर स्वामित्व नाहीं त्याचें जीवन म्हणजे अस्ताव्यस्त पसारा होय.

पान क्र. ३०


 

      भावनाविवश न होण्यामध्ये मला कांहींच चुकीचें दिसत नाहीं. खऱ्या दिव्य प्रेमापासून भावनाविवशतेइतकी कोणतीच गोष्ट अधिक दूर नाहीं. ......भावनावेगांच्या आहारीं जाऊन कोणतेंच कर्म करूं नका.

*

      प्रतीक्षा कशी करावयाची हें जाणणें म्हणजे कालास अनुकूल करून घेणें आहे......धिमेपणानें आपण उद्दिष्टाप्रत पोंचतों. सततच्या यत्नशील इच्छाबलानें सर्व अडथळे ओलांडतां येतात.

*

      आपल्यामधील कोणत्या दुर्बळता ओलांडावयास पाहिजेत हें दाखविण्यासाठींच नेहमीं आपल्यावर प्रसंग येत असतात.

*

      जेव्हां तुमच्या स्वतःमध्यें खरोखरीच बदल होईल तेव्हां तुमच्या कडेच्याहि सर्व गोष्टी बदलतील.

*

      तुमच्या शब्दांवर तुम्ही संयम ठेवला पाहिजे. क्रोधभावना किंवा अविवेक यांच्या आहारीं जाऊन तुम्हीं बोलतां कामां नये.

*

      आपल्या वाणींतून अथवा लेखनद्धारां लहानसें कां होईना, असत्य व्यक्त होण्यास वाव दिला, तर दिव्य सत्याचे उत्कृष्ट संदेशवाहक बनण्याची आपणांस कशी आशा करतां येईल

*

      दिव्य सत्याच्या उत्कृष्ट सेवकानें यत्किंचीतही अयथार्थता, अतिरेक किंवा विकृति यांपासून अगदीं अलिप्त राहिलें पाहिजे.

*

पान क्र. ३१


     

      धीर असेल तर कोणतीहि अडचण ओलांडतां येईल. खेळाडू वृत्ति, धाडसी वृत्ति व जीवनाच्या कोणत्याहि क्षेत्रांत अडचणींना न जुमानतां, न डगमगतां तोंड देणें या गोष्टी ध्येयभूत सहनशीलतेमध्यें येतात.

*

      जीवनांतील क्षुद्र त्रास सहन करण्यास तुम्हीं शिकलें पाहिजे. सहनशीलतेवांचून कोणतेंच मोठें कार्य कधींही तडीस गेलेलें नाहीं.

*

      चिकाटी नसतांना कधींच कांहींहि प्राप्त करून घेणें शक्य नाहीं. एखादी गोष्ट कठीण आहे याकरितां ती सोडूनच द्यायची असें तुम्हीं करतां कामा नये. उलट, एखादी गोष्ट जितकी अधिक कठीण, तितका अधिक दढनिश्चय करून आपण ती साध्य केली पाहिजे.

*

      या विशाल जगांत करण्याजोग्या चांगल्या गोष्टी किंवा त्या हातीं घेण्यासाठी चांगलीं माणसें कमी आहेत असें कधींच नसतें. बहुतेकवेळीं एक गोष्ट कमी पडते, आणि ती म्हणजे अखेरपर्यंत पोहोचविणारा गुण चिकाटी.

***

पान क्र. ३२